सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Advt.

Advt.

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२

जैन आणि बौद्ध धर्माचे मूळ श्रमण परंपरेत

-महावीर सांगलीकर

जैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्म वैदिक धर्माच्या विरोधासाठी निर्माण झाले असा कित्येकांचा समज आहे. पण जैन धर्माचे मूळ सिंधू संस्कृतीत असल्याने तो वैदिक धर्माच्या ही आधी अस्तित्वात होता, आणि सिंधू संकृती ही वैदिकांचा सर्वात प्राचीन ग्रंथ ऋग्वेदाच्या रचनेच्या आधीपासून अस्तित्वात असल्याने  वैदिक धर्माच्या विरोधासाठी जैन धर्माचा जन्म झाला असे म्हणणे चुकीचे ठरते. तीच गोष्ट बौद्ध धर्माची. बौद्ध धर्माची स्थापना गौतम बुद्ध यांनी वैदिक विरोधात केली असे कोणत्याही बौद्ध ग्रंथात, बुद्धचरित्रात लिहिलेले नाही.

वैदिक धर्मातील यज्ञामध्ये होणारी पशुहिंसा जैन आणि बौद्ध या दोन्ही धर्मास मान्य नव्हती. त्यामुळे या दोन्ही धर्माच्या आचार्यांनी यज्ञातील पशुहिंसेला प्रचंड विरोध केला. पण याचा अर्थ असा होत नाही की जैन आणि बौद्ध हे धर्म वैदिक धर्माच्या विरोधातून जन्माला आले.

जैन आणि बौद्ध हे धर्म वैदिक धर्माच्या विरोधातील बंडातून जन्माला आले असे म्हणणे म्हणजे या दोन्ही धर्माचे मूळ वैदिक धर्मात आहे असे म्हणण्यासारखे आहे. पण वैदिक धर्म अस्तित्वात यायच्या अगोदर पासून या देशात श्रमण परंपरा अस्तित्वात होती आणि जैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्म त्या श्रमण परंपरेच्या शाखा आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

जैन, बौद्ध आणि वैदिकांच्या कोणत्याही ग्रंथात महावीर व गौतम बुद्ध आधी वैदिक असल्याचा उल्लेख नाही. जैन ग्रंथात महावीरांचे आई-वडील हे पार्श्वनाथाच्या चातुर्याम धर्माचे अनुयायी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. गौतम बुद्धांचे आई-वडील हे देखील याच परंपरेतील होते. (पहा: पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म, लेखक डॉ. धर्मानंद कोसंबी). पार्श्वनाथ हे श्रमण परंपरेतील एक महान व्यक्तीमत्व होते. ही श्रमण परंपरा महावीरांनी, गौतम बुद्धांनी किंवा पार्श्वनाथांनी सुरू केली नव्हती, तर ती या देशातील मूळ परंपरा आहे.

महावीर हे जैन धर्माचे २४वे तीर्थंकर होते. त्यांच्या आधी २३ तीर्थंकर होवून गेले, तर गौतम बुद्धांच्या अगोदर २४ बुद्ध होवून गेले. तीर्थंकर, बुद्ध, जिन, अर्हत, अरिहंत ही व्यक्तींची नावे नसून पदांची नावे आहेत. या सगळ्या शब्दांना ऋग्वेदाच्या अगोदर पासूनचा इतिहास आहे. वैदिक परंपरेतही २४ अवतारांची संकल्पना आहे, पण ती पुराणांतील संकल्पना आहे. पुराणे ही महावीर व गौतम बुद्ध यांच्या नंतर शेकडो वर्षांने लिहिली गेली आहेत (पहा: ब्राम्हणी साहित्य, लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर). यावरून २४ अवतार ही संकल्पना सरळ सरळ २४ तीर्थंकर व २४ बुद्ध यावरून नंतर उचलेली आहे हे स्पष्ट दिसते. अशोक चक्रातही २४ आरे असतात, हा केवळ योगायोग नव्हे. अशोकाच्या काळात वैदिक परंपरेत २४ अवतार ही संकल्पना नव्हती.

त्यामुळे जैन आणि बौद्ध धर्म हे वैदिक धर्माच्या विरोधातून तयार झाले असे म्हणणे हे पूर्ण चुकीचे आहे. वैदिकांनी तसे म्हणणे स्वाभाविक आहे, कारण त्यांना त्यातून आपली प्राचीनता दाखवायची असते. पण सध्या अनेक बौद्ध विद्वान देखील वैदिकांच्या या म्हणण्याला उघड किंवा मूक पाठिंबा देत आहेत, ही खेदाची गोष्ट आहे.

हेही वाचा:
भारतीय इतिहासाची जैन साधने: भाग 1: जैन शिलालेख
भारतीयांचा इतिहासबोध
राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ
वारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे?

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

Sanglikarji,
Jai Jinedra!!

I often use to read your blogs to know more about the Jain history, and the blogs are really informative.

I am really thankful to you for this informative blogs.

I just read a book "Sankshipta Jain Itihaas" by muni Sunil Sagarji Maharaj. He has mentioned all the proofs for proving the Jain origin is pre-Vedic.

Thanks & Regards,
Ashish

Vijay म्हणाले...

Kush lava hi shriramanchi mule valmiki navachya rushichya aashramat vadhali va raje padavar basali. tyanni ji rushi parampara chalu keli ti pudhe jain mhanun udayas aali. veda he fakta brahamananche navhate kshatriyanchehi hote kshariya paramparetil yadanyat pashu hatya hot. shudha brahaman paramparet pashuhatya hot nase.

Popular Posts

कृपया हे पेज लाईक करावे